नसता महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच- विजय वडेट्टीवार.

नागपूर दि.12 एप्रिल- महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढून कोरोनाचा कहर दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात अशीच विस्फोटक परिस्थिती राहील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच, असं सांगतानाच माणसं मरत असताना उत्सव कशाला करताय, असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी करत नसता राज्यात मृतदेहांचा खच पडेल, अशी भीती व्यक्त केली.

(Without it, there will be a cost of dead bodies in Maharashtra, there is no alternative but 14 days lockdown – Vijay Vadettiwar.)

विजय वडेट्टीवार यांनी नागपुर येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, वीकेंड लॉकडाऊन लावल्यानंतरही आज राज्यात ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसत आहे. होणारी ही गर्दी अतिशय घातक आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. भविष्यात ही परिस्थिती अधिक भयावह होणार आहे. या कोरोनातून वाचायचं असेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन (lockdown) होईल तेव्हा होईल. परंतु, तुम्ही घराबाहेर पडू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात (Maharashtra) मृतदेहांचा खच पडेल, अशी भीती विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊन वर बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठवडाभराचा लॉकडाऊन (lockdown) व्हावा असं वाटत आहे. परंतु आठ दिवसाच्या लॉकडाऊनने काहीही होणार नाही. कोरोनाची साखळी मोडायची असेल तर किमान 14 दिवसाचा लॉकडाऊन असला पाहिजे. तरच कोरोनाची साखळी तोडता येईल. मात्र, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच होईल. लॉकडाऊन करताना कुणाला काय मदत करायची याचा विचार केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याचा आढावा घेत असून येत्या दोन चार दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.

15 एप्रिलनंतर लॉकडाऊनचा निर्णय
मे अखेर पर्यंत राज्यात कोरोनाची विस्फोटक परिस्थिती राहिल. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. राज्यात शंभर टक्के लॉकडाऊन होणार असल्याचं सांगतानाच उद्या गुढीपाडवा आहे आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यामुळे 15 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊन करताना काही गोष्टींना सूट देऊन चालणार नाही. याकाळात मुंबईतील लोकलवर निर्बंध लावायचे की नाही, याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे. कॅबिनेटमध्ये त्याबाबत चर्चा होईल. कारण मुंबईतील लोकलची गर्दी थांबवावीच लागणार आहे, असंही त्यांनी सांगेल.

केंद्र सरकारने जाहिर केलेल्या लसीकरण उत्सव (Vaccination Festival) मोहिमेचाही त्यांनी समाचार घेतला. राज्यात लस नाही. लोक लसीची प्रतिक्षा करत आहेत. माणसं मरत आहेत. मग लसीकरण उत्सव (Vaccination Festival) कशाला? असा सवाल करतानाच कोरोनावर व विजय मिळवल्यानंतर उत्सव करता येईल. त्यासाठी इतकी घाई कशाला?, असा सवालही त्यांनी केला. लॉकडाऊन आणि लसीच्या पुरवठ्याबाबत कुणी राजकारण करू नये. कुणी उपकाराची भाषा करत असेल तर ती पदाशी बेईमानी ठरेल, असंही ते म्हणाले.

नर्स, डॉक्टर आभाळातून पडणार नाही
राज्यात बेड्सची कमतरता आहे. बेड्स एका दिवसात वाढवता येतीलही. परंतु, नर्स आणि डॉक्टर कुठून आणणार? नर्स आणि डॉक्टर्स काही आभाळातून पडणार नाहीत, त्यामुळे नागरिकांनीच याचा विचार करावा. विनाकारण गर्दी करू नये. ताप अंगावर काढू नये, तात्काळ उपचार घ्यावेत आणि कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!