कोरोनामुक्त गावात शाळा सुरु होणार; शासनाचा मोठा निर्णय.

मुंबई दि.23 जून – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची गांभीर्याने दखल घेत कोरोनामुक्त गावांतील दहावी व बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची शक्यता पडताळून पहा, असे निर्देश शिक्षण विभागाला (Department of education) दिले. जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गावे कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांबाबत ही पडताळणी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत दिले.
(School to start in Coronamukta village; Big decision of the government.)
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. या बैठकीत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन, कोरानामुळे पालक गमावलेल्या मुलांचा शैक्षणिक खर्च तसेच अन्य शैक्षणिक विषयांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबाबत प्रस्ताव
कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत (Department of education) प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा, असे निर्देश दिले.
प्रस्ताव सादर करा
बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या 12 वीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता 10 वीसाठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून 12 वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.