परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला असून तो पुढेही कोरोनामुक्तच राहील – ना. नवाब मलिक
सर्व यंत्रणांचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मानले आभार, कामाचे केले कौतुक...

परभणी दि.२८(प्रतिनिधी) जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित रुग्णाचा तिसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री ना. नवाब मलिक यांनी आभार मानले तसेच यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले आहे.
पुण्यातून आलेल्या कुटुंबातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. त्या रुग्णाच्या कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने जिल्हयात खबरदारी घेतली होती. दरम्यान या कामी मेहनत घेणाऱ्या यंत्रणेचे विशेषतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचारी या सर्वांच्या कामाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी कौतुक केले आहे आणि यापुढेही परभणी जिल्हा कोरोनामुक्तच राहील असा विश्वासही आपल्या फेसबुक पेजवरुन व्यक्त केला आहे.