धारुरमध्ये शालेय विद्यार्थीनीची आत्महत्या

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) शहरात पाटील गल्लीत एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीने घरगुती किरकोळ कारणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल दि.३ गुरुवारी रात्री घडली असुन घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
देशात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे नुकतेच एनसीआरबीच्या अहवालात समोर आले आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण सर्वाधिक असून यात विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. काल अशीच एका शालेय विद्यार्थीनीची आत्महत्या समोर आली आहे. शहरातील पाटील गल्लीत राहणाऱ्या पंडित कुटूंबियावर दुखाचा डोंगर कोसळला. घरात अॉनलाईन शिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल वरुन बहिणीं सोबत झालेल्या किरकोळ वादातून दुखद घटना घडली असल्याची चर्चा समोर येत आहे. दिव्या दिलिप पंडित (१४) या नववीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने घरातच गळफास घेतल्याचे सायंकाळी ७ च्या सुमारास निदर्शनास आले. कुटूंबियांनी तात्काळ तिस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. धारुर पोलिसात याबाबत खबर देण्यात आली असुन मयत विद्यार्थीनी ही रागिट स्वभावाची असल्याने बहिणींसोबत घरगुती किरकोळ कारणाने वाद झाल्यामुळे घरात दुसऱ्या मजल्यावर जावून गळफास घेतल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ए.एस.आय. गोविंद बास्टे करत आहेत. या दुखद घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.