20 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या ; धारुर तालुक्यातील घटना.

किल्लेधारुर दि.11 अॉगस्ट – २० वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ( दि. 11 ) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने आसरडोह गावात खळबळ उडाली आहे.
वैष्णव वैजनाथ तोडकर ( वय 20 वर्ष ) रा. आसरडोह ( ता. धारुर ) असे मयत तरुणाचे नाव आहे. वैष्णव हा सकाळी रिक्षा घेऊन शेतात मजुरी करणाऱ्या शेतमजूर महिलांना सोडण्यासाठी शेतात गेला. शेतमजूर महिलांना सोडून शेतात जनावरे चारत असलेल्या चुलत्यास जनावरे मी चारतो म्हणून शेतातच थांबला. दुपार झाली तरी जेवण करण्यासाठी घरी न आल्याने आणि फोनही उचलत नसल्याने आईंनी दुसऱ्या भावास बोलावून आणण्याकरिता शेतात पाठवले.
शेतात बोलावण्यासाठी गेलेल्या भावास वैष्णवचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली एक चांगला होतकरू व सधन घरातील तरुणाने असा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती आडस येथील चौकीच्या पोलीसांना देण्यात आली आहे. आत्महत्येचे (suicide) कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.