लिंबागणेश येथे २९ वर्षीय महिलेचा शेततळ्यात बुडुन मृत्यू

लिंबागणेशः दि.९(प्रतिनिधी) सायंकाळी पाणी आणण्यासाठी गेलेल्या उषा संदिप गिरे वय २९ वर्षे रा.गिरेवस्ती, लिंबागणेश यांचा शेजारील शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रात्री घडली असून नेकनुर पोलिसांत याबाबत नोंद करण्यात आली आहे.
दि.०८ बुधवार रोजी सायंकाळी ६ वा शेततळ्यावरुन पाणी घेऊन येते असे पती संदिप रमेश गिरे यांना सांगुन गेलेल्या उषा रात्री ८ पर्यंत घरी परतल्याच नाहीत. पावसामुळे कदाचीत निवा-यासाठी भावकितील कोणाच्या घरी थांबल्या असतील म्हणून भावकी मध्ये विचारणा केली. कुठेच न सापडल्याने त्यांनी ईतरत्र शोधाशोध केली परंतु आढळुन आल्या नाहीत. शेवटी त्यांनी शेततळ्याकडे शोधाशोध केली असता शेततळ्यात त्यांना बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्या. सदरील घटना तात्काळ लिंबागणेश पोलिस चौकीतील कर्मचारी यांना कळवण्यात आले. पोलिसांनी स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. आज सकाळी वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.रकटे यांनी सकाळी ९ वा. उत्तरीय तपासणीस सुरूवात केली. पोलिस तपास स.पो.नि. लक्ष्मण केंद्रे, नेकनुर ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबागणेश येथिल पोलिस कर्मचारी करत आहेत. उषा यांच्या पश्चात पती संदिप रमेश गिरे व दोन लहान मुले, सार्थक वय ७ वर्षे आणि संस्कार वय ४ वर्षे असा परीवार असुन त्यांचे माहेर गेवराई तालुक्यातील मौजे पिंपळा (कानडा) आहे.