धारुर- अंबाजोगाई रस्त्यावर पुन्हा मलमपट्टी

किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) गेल्या अनेक दिवसांपासून नागरीकांतून धारुर Dharur-आडस- अंबाजोगाई Ambajogai रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात होती. या रस्त्यावर पडलेली खड्डे भरण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली असून संपूर्ण उध्वस्त झालेल्या रस्त्यावर पुन्हा केवळ मलपट्टी होत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
लातुर ते औरंगाबाद Aurangabad सह नांदेड, हैद्राबाद, गंगाखेड, परभणी, अहमदपूर, चाकुर आदी शहराकडे जाण्यासाठी धारुर Dharur ते अंबाजोगाई Ambajogai हा रस्ता सतत वापरला जातो. या रस्त्यावर मोठी वाहतूक असल्याने रस्त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाणही अधिक आहे. प्रतिवर्षी या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करुन खड्डे भरण्याचे काम केले जाते. मागच्या सहा महिन्यात या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाल्याने नागरीकांतून रस्ता करण्याची मागणी होती. अनेक दिवसांपासून रखडलेल्या खड्डे भरण्याच्या कामाचा सार्वजनिक बांधकाम खात्याने शुभारंभ केला. प्रतिवर्षी भरलेली खड्डे अवघ्या काही दिवसात पुर्ववत खड्ड्यात रुपांतरीत होतात. यामुळे किमान चांगल्या दर्जाने खड्डे भरावीत अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वाहनधारकातून व्यक्त केली जात आहे.