लातूर मधील त्या शाळेत आणखी ५ बाधित; शाळा दहा दिवस बंद

लातूर : दि.२४- लातूर शहरातील एका शाळेत ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच शाळेत आज आणखी ५ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. यामुळे लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या शाळेतील ४५ जणांना कोरोनाची लागण झाली. शाळेतील ३६६ पैकी ३६० विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. एमआयडीसी (Latur MIDC) भागात असलेल्या पब्लिक शाळेच्या ४५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शाळा पुढील दहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपाच्या आरोग्य पथकांकडून बाधित मुलांची काळजी घेतली जात आहे.
(5 more affected in that school in Latur; School closed for ten days)
शिक्षक आणि वस्तिगृहाच्या मेसमधील कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. हे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या या शाळेच्या वस्तिगृहात रहात आहेत. लातूरच्या एमआयडीसी (Latur MIDC) भागात एक सीबीएसई शाळा आहे. या शाळेच्या वस्तिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीमध्ये कोरोनाची पहिल्यांदा लक्षणे आढळली. त्या नंतर इतर विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आज यात आणखी वाढ होवून संख्या ४५ वर पोहोचली आहे. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वस्तिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यांतल्या विविध शहरांत कोरोनाचे अधिकाधिक संख्येने रुग्ण मिळत आहेत. लातूरातही सोमवारी एकाच दिवशी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ३ कोरोनाबाधितांचा (Corona Positive) मृत्यू झाला. लातुरात आतापर्यंत २४ हजार ९०१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २३ हजार ८५६ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तर जवळपास १५० रुग्णांवर शहरातल्या विविध रुग्णांलयांमध्ये उपचार सुरु आहेत. यातील काही रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.
लातूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढायला सुरुवात झाल्यापासून महापालिका अॅक्शन मोडमध्ये आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका कारवाई करत आहे. जो नागरिक विनामास्क फिरेल त्याच्याकडून १०० रुपये दंड वसूल केला जात आहे तर तोच नागरिक दुसऱ्यांदा विनामास्क आढळला तर त्याच्याकडून ५०० रुपये दंड घेतला जात आहे.
नागरिकांनी नियम पाळावेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन नागरिकांनी करुन शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं सांगत सध्या तरी लातुरात लॉकडाऊनचं कुठलंही प्रयोजन नाही मात्र नागरिकांनी नियम पाळले नाही तर कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशारा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.