एमएससिआयटी केंद्र बंद असल्याने इच्छूकांची गैरसोय; राज्यातील अनेक जिल्ह्यात परवानगी तर बीड जिल्ह्यात अद्यापही प्रतिक्षा

बीडः दि.१७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून संगणक प्रशिक्षण केंद्र अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. सध्या शासनाच्या अनेक रिक्त जागावर भरती सुरु असून भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छूकांची एमएससिआयटी (MS-CIT) प्रमाणपत्र नसल्याने तारांबळ उडत आहे. अनलॉक सुरु झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात कोविडचे नियम पाळत एमएससिआयटी (MS-CIT) केंद्र सुरु झाली आहेत मात्र अद्याप बीड जिल्ह्यात सदरील केंद्र परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत.
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून जवळपास 5000 (MS-CIT) केंद्र चालवली जातात. ज्याची परिक्षा व प्रमाणपत्र वितरण महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून होते. सदरील अभ्यासक्रम शासनाच्या सेवेत असलेल्या व सेवेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. यासोबतच संगणक साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा अभ्यासक्रम पुर्ण करण्याकडे असतो. एमएससिआयटी (MS-CIT) अभ्यासक्रमा शिवाय या केंद्रात शासनाच्या विविध योजनाही राबवल्या जातात. मात्र गेल्या आठ महिन्यापुर्वी सुरु झालेल्या कोविड-१९ काळात ही सर्व केंद्र बंद आहेत. बीड जिल्ह्यात 122 (MS-CIT) केंद्र आहेत. सदरील सर्व (MS-CIT) केंद्र खाजगी आस्थापना आहेत. केंद्र व राज्य शासनाने अनलॉकच्या भुमिकेत अनेक खाजगी आस्थापना सुरु करण्याची परवानगी दिली आहे. या अंतर्गत राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यात (MS-CIT) केंद्र सुरु झाली आहेत. यात राज्यातील कोविडचा अतिप्रादुर्भाव असलेल्या ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. परंतू शेकडो लोकांची उपजिविका असलेल्या या आस्थापनाकडे अद्यापही बीड जिल्ह्यात प्रशासनाकडून दुर्लक्ष असल्याचे दिसुन येते. सहजरित्या कोविड (Covid-19) नियम पाळून या आस्थापना सुरु केल्या जावू शकतात. कोविड (Covid-19) नियमांचे पालन करुन संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केल्यास अॉनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन मिळून अनेकांची गैरसोय दूर होणार आहे. शासनाने सोमवार पासून कौशल्य विकास आधारीत शासकीय आयटीआय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक जिल्ह्यात संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु झाली आहेत. याच धर्तीवर जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करावीत अशी मागणी होत आहे.