सावधान … राज्यात पुन्हा नवीन रुग्ण व मृत्यू संख्येत वाढ; नियम पाळा… नसता…

- मुंबई दि.11 जून – कोरोनाची रुग्णसंख्या कमी झालेली असताना राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच राज्यात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आलं आहे. केवळ रुग्ण संख्याच नव्हे तर मृत्यूची (Corona death) संख्येतही वाढ दिसुन आली. तर गुरुवारी बरे होणाऱ्यांची संख्याही नव्या कोरोना बाधितांपेक्षा कमी होती.
(Caution … increase in the number of new patients and deaths in the state again; Follow the rules)
गेल्या काही दिवसात कमी झालेली रुग्ण संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्यात बहुतेक जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आलेली असल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी दिसुन येत आहे. प्रशासनाकडून कोरोना चाचण्या कमी होत असल्याने आकडेवारीतही मोठी घट झाली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांत लक्षणे दिसुन येणाऱ्यां संशयिताच्या चाचण्या वाढल्या तशी रुग्ण संख्या वाढली आहे. सदरील बाब चिंताजनक असून लोकांनी कोविड नियमांचे पालन करावे नसता तिसरी लाट लगेच सुरु होण्याचा धोका आहे.
गुरुवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 12 हजार 207 नव्या कोरोना बाधितांची (Corona Positive) नोंद करण्यात आली होती. हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये 10 हजारांच्या घरात आला होता. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 58 लाख 76 हजार 87 इतकी झाली आहे. यापैकी 1 लाख 60 हजार 693 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक (Unlock) सुरू करून 5 दिवस उलटले असून आज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येसोबतच मृतांचा (Corona death) आकडा देखील वाढला असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात आज एकीकडे नवे कोरोना बाधित (Corona Positive) वाढले असले, तरी दुसरीकडे 11 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता 56 लाख 8 हजार 753 इतका झाला आहे. त्यामुळे अजूनही राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 95 टक्क्यांच्या वरच असून तो 95.45 इतका नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 95 टक्क्यांच्या वर असताना आज राज्यात मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बुधवारी राज्यात 261 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. आज हा आकडा वाढून 393 इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.77 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत राज्यात कोरोनामुळे 1 लाख 3 हजार 748 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत आज दिवसभरात 660 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत नवे कोरोना बाधित सापडण्याचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. त्याचवेळी दुसरीकडे आज दिवसभरात 768 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजपर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 81 हजार 288 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, आज दिवसभरात 22 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 15 हजार 122 इतका झाला आहे.