देशात कोरोना कहर; 24 तासातील मृत्यूची उच्चांकी नोंद…

नवी दिल्ली दि.19 मे – देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गेल्या 24 तासांतील मृत्यूची आकडेवारीही भयावह आहे. देशात मंगळवारी 4 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात एका दिवसातील आतापर्यंतची ही उच्चांकी नोंद झाली आहे.
(Corona havoc in the country; 24 hour death toll high …)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. या लाटेत देशात जगातील विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. आता हळूहळू नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोना मृत्यूची (Corona Death) लाट आल्याचंच दृश्य आहे.
देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्र (Maharashtra), दिल्लीत उद्रेक झाल्यानंतर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोरोना परिस्थिती बिकट बनली आहे. कोरोना आणि कोरोनानंतर उद्भवणाऱ्या व्याधींमुळे देशात मोठ्या संख्येनं मृत्यू (Corona Death) होत आहेत.
कोरोनामुळे प्राण गमवाव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या 24 तासांतील आकडेवारी झोप उडवणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात 2 लाख 67 हजार 334 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत.
दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात 3 लाख 89 हजार 851 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. असं असलं तरी वाढत्या मृत्यू संख्येनं देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या 24 तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी 4 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 2 लाख 83 हजार 248 वर जाऊन पोहोचली आहे.
सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात (Maharashtra) नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात 679 मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक 525, तामिळनाडू 364 या राज्यांचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात 28 हजार 438 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत, तर कर्नाटकात 30 हजार आणि तामिळनाडूत 33 हजार नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिली आहे.