पोलिसांच्या मारहाणीनंतर शेतकऱ्याची आत्महत्या….

अमरावती: दि.२३- व्यापाऱ्याकडून झालेल्या फसवणूकीबाबत पोलिसांकडे दाद मागण्यास गेलेल्या शेतकऱ्यास पोलिसांनी मारहाण केल्याच्या रागातून एका शेतकऱ्याने थेट राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना पत्र लिहून विषारी औषध पित आत्महत्या (Suicide) केल्याची घटना मंगळवार दि.२२ रोजी घडली. अशोक पांडुरंग भुयार (५५, रा. धनेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकरी अशोक भुयार यांनी त्यांच्या धनेगाव येथील शेतातील संत्री अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकण्याचा व्यवहार केला. मात्र, त्या दोन व्यापाऱ्यांनी भुयार यांना शेतामध्ये दारू पाजून संत्राविक्रीचे पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने सही घेतली. मारहाणदेखील केली. त्याबाबतची तक्रार (FIR) देण्यास ते धनेगाव येथील पोलीस पाटलासह अंजनगाव पोलीस (Police) ठाण्यात १८ डिसेंबर रोजी गेले असता, त्याठिकाणी बीट जमादार व ठाणेदाराने बेदम मारहाण केली, याबाबत भुयार यांनी ना. बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या नावे चिठ्ठी लिहून त्याखाली इंग्रजीमध्ये स्वाक्षरी केली. या घटनेनंतर मंगळवारी दुपारपासून ठाण्यातील वातावरण चिघळले. शेतकऱ्याच्या आत्महत्येस (Suicide) कारणीभूत ठरलेल्या ठाणेदार व बीट जमादाराविरुद्ध गून्हा दाखल करण्याची मागणी संतप्त जमावाने केली. अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी तातडीने अंजनगाव पोलीस ठाणे गाठले. ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून याप्रकरणी सायंकाळी अंजनगाव सुर्जी पोलीस (Police) ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक श्रावण जाधव व संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर (दोघेही रा.अंजनगाव सुर्जी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.