५० लग्नाळू तरुणांना फसवणाऱ्या नवरीसह टोळी जेरबंद….

पुणे दि.१४ फेब्रुवारी:- प्राथमिक तपासात उघडकीस आलेल्या ५० पेक्षा जास्त लग्नाळू तरुणांच्या कुटुंबांची लुट करणाऱ्या टोळातील ९ महिला आणि २ पुरूषांना पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाळू तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांच्याशी खोटे लग्न करून दागिने, पैसे घेऊन पळून जाणाऱ्या नवरीच्या टोळीला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती रवींद्र पाटील (३५) असं अटक केलेल्या मुख्य आरोपी महिलेचे नाव आहे. या महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने नाशिक, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वापी आणि कोल्हापुरातील नागरिकांना गंडा घातला आहे. एका तरुणाच्या तक्रारीनंतर सदरील टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लग्नाचे खोटे नाटक करून ही टोळी महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटक राज्यात सक्रिय झाली होती. या महिलेने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त पुरूषांना फसवून त्यांच्याशी लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू आणि कपडे घेऊन नवरी या टोळीसह पसार होत होती. पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे कर्मचारी एका गुन्ह्याचा तपास करीत असताना तक्रारदाराने ज्योती पाटील ही महिला एका महिन्यांपूर्वी भेटली होती. तिने लग्न लावून देण्याचे सांगत तरूणाकडून अडीच लाख रूपये घेतले. लग्नानंतर लग्न केलेल्या मुलीने तक्रारदाराच्या घरातून अडीच लाख रूपये घेऊन पळ काढला होता अशी माहिती मिळाली. तपास केला असता या टोळीने केलेल्या गुन्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने जवळपास पन्नास कुटुंबांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले. मात्र, सामाजिक प्रतिष्ठा पोटी या कुटुंबांनी अजूनही पोलिसांकडे तक्रारी केलेल्या नाहीत. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून आता पुन्हा पीडित नागरिकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. लग्नाळू मुलांना ठकवणाऱ्या महिलांची टोळी ही राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. लग्न करताच दोन दिवसांनी माहेरी जाऊन परत येते, असं सांगून सोनं आणि पैसे घेऊन नवरीच पळून जात असल्यामुळे तक्रार कशी करावी असा प्रश्न पीडित कुटुंबासमोर असायचा. त्यामुळेच या टोळीने अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले. मात्र एका तरुणाच्या तक्रारी मुळे आता त्या कायद्याच्या बडग्यात सापडल्या असून पोलिस सखोल चौकशी करत आहेत.