अनोख्या रंगोत्सवावर ‘कोरोना’मुळे विर्जन …

किल्लेधारूर दि.29 मार्च – शहरातील पारंपारिक रंगोत्सवाला यंदा जिल्ह्यात सुरु असलेल्या लॉकडाऊन (lockdown) मुळे मुकावे लागणार आहे. शहरात हिंदी भाषिक समाजाच्या वतीने प्रतिवर्षी पाच दिवसांचा रंगोत्सव साजरा होतो. गतवर्षी होळी उत्सवानंतर आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वत्र सण उत्सवावर विर्जन पडले होते.
(Immersion due to ‘Corona’ on unique color festival …)
होळी (Holi festival) म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी (Holi festival) साजरी केली जाते. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन किंवा धूळवड खेळली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळी, धुलिवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत ठिकठिकाणच्या प्रशासनाकडून आदेश जारी केले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दहा दिवसाचा लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे. 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान हा लॉकडाऊन आहे. याच दरम्यान रंगोत्सव आहे. होळी पेटल्यानंतर त्याच रात्री गुलालाची उधळण करुन रंगोत्सवाचा आरंभ होतो. होळी पासून ते रंगपंचमीपर्यंत येथील रंगोत्सव साजरा होत असतो. हा पाच दिवसाचा पारंपारिक रंगोत्सव येथील हिंदी भाषिक राजपुत व कान्यकुब्ज ब्राम्हण समाज पारंपारिक पध्दतीने साजरा करतात.
या रंगोत्सवात धारुर (Dharur) शहरातील कटघरपुरा ते मुख्य रस्त्यावर क्रांती चौकात असलेल्या बालाजी मंदिरापर्यंत चाचर काढली जाते. या चाचरीत तरुणांचे टोळके फागुन गीत गात रंगाची उधळण करतात. या गीतात अनेक देशभक्तीपर गीतांसह लोकगीतांचा समावेश असतो. सकाळी व संध्याकाळी दोन वेळा चाचर काढली जाते. सलग पाच दिवस समाजातील प्रतिष्ठित कुटूंबियांकडून सांयकाळी समाजातील लोकांसह गावातील मित्रवर्गासाठी भांग व ठंडाईचा कार्यक्रम असतो. शेवटच्या दिवशी जावायाची गाढवावरुन मिरवणूक काढून त्यास आहेरपाणी करण्याची प्रथा आजही पाळली जाते.
या रंगोत्सवात सर्व जाती धर्मातील लोक सहभागी होतात. सतत पाच दिवस रंग खेळण्याची ही प्रथा केवळ धारुर (Dharur) शहरातच पहायला मिळते. या रंगोत्सवासाठी हिंदी भाषिक समाजातील नोकरी निमित्ताने बाहेर गावी स्थलांतरीत व स्थायिक झालेल्या नातलग गावात येत असतात. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे हा पारंपारिक रंगोत्सव नसल्याने सर्वांचा हिरमोड होत आहे. बीड जिल्ह्यातील या अनोख्या रंगोत्सवाचा लौकीक सर्वदूर आहे.