पंगतीतील जेवणातून 22 जणांना विषबाधा ; परळी तालुक्यातील घटना.

परळी दि.8 जुलै – पंगतीतील जेवणातून 22 जणांना विषबाधा झाल्याची घटना परळी तालुक्यातील तडोळी येथे गुरुवारी घडली. जेवण केलेल्या काही जणांना डोकं जड पडणे, उलटी व मळमळीचा त्रास सुरू झाल्याने 22 जणांना तातडीने गावातील वाहनातून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात सायंकाळी दाखल करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परळी तालुक्यातील तडोळी येथे एकाच्या पुण्यतिथी निमित्त जेवणाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील जेवणातून अचानक काही जणांना डोकं जड पडणे, उलटी व मळमळीचा त्रास सुरू झाला. जवळजवळ 22 जणांना जेवणातून विषबाधा झाली. बाधितांना संध्याकाळी तात्काळ अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तिर्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (Dean of Medical College) डॉ. भास्कर खैरे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. नागेश आबादागिरे व इतर डॉक्टर व कर्मचारी यांनी स्वतः गुरुवारी सायंकाळी रुग्णालयात थांबून तडोळीच्या 22 बाधितांवर उपचार केले. बाधितांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. मात्र या कार्यक्रमात इतर अनेकांनी जेवण केले असून इतरांना कसलीही बाधा झालेली नाही.
( Poisoning of 22 people in a row meal; Incidents in Parli taluka. )