पतीने दुसरे लग्न केल्याच्या रागातून तीन मुलांसह मातेने केली आत्महत्या…

मुंबईः– दि.१२- भिवंडीच्या पाच्छापूर जंगलात तीन मुलांना गळफास देऊन मातेने आत्महत्या (suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने भिवंडी हादरली असून झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत चारही जणांचे मृतदेह दिसून आले. प्राथमिक माहितीनूसार दोन महिन्यापुर्वी पतीने दुसरे लग्न केल्यानंतर झालेल्या वादातून तीनच दिवसात पहिली पत्नी तीन लेकरांसह बेपत्ता झाली होती. जवळच्याच तानसा अभयारण्यात जावून तिने मुलांसह हे कृत्य केल्याची माहिती येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भिवंडी तालुक्यातील उंबरखांड या गावात राहणारे श्रीपत बच्चू बांगारे यांची पत्नी रंजना हिचे अॉपरेशन झाले. यामुळे घरातील कामासाठी रंजनाची मावस बहिण सविता घरी आली. यातूनच सविता व श्रीपत यांच्यात प्रेमसंबध जुळले. याप्रेमसंबंधातून त्यांनी दुसरे लग्न केले. यामुळे निराश झालेली रंजना तीन दिवसांनी आपल्या तीन लेकरांसह घरातून बेपत्ता झाली. श्रीपत बच्चू बांगारे यांनी आपली पत्नी रंजना (३०) तसेच दर्शना (१२), रोहिणी (६), रोहित (९) ही तीन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार २१ ऑक्टोबर रोजी पडघा पोलीस (Police) ठाण्यात केली होती. बऱ्याच ठिकाणी शोध घेऊनही पत्नी व मुलांचा थांगपत्ता लागला नाही. गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ संतोष हा पाच्छापूर येथील जंगलात लाकडे शोधण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका झाडावरून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. जवळ जाऊन बघताच त्या झाडाला चार मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. कपड्यामुळे त्याला संशय आला आणि भाऊ श्रीपत याला ते दाखवले. या कपड्यावरून चौघांचीही ओळख पटली. दोन महिन्यांनंतर चौघांचा अक्षरशः सांगाडा झाला होता. पत्नी आणि तीन मुलांचे पार्थिव बघून वडिल श्रीपत व दुसरी पत्नी सविता यांनी विष पिऊन स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असून जे. जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत रंजनाचा भाऊ अनंता भगत याने ही आत्महत्या (suicide) नसुन हत्या (Murder) असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. याप्रकरणाचा पोलिस (Police) हत्या (Murder) की आत्महत्या (suicide) याचा कसुन तपास करीत आहे.