कोरोंना विशेष

अहमदनगरमध्ये मृत्यूचं तांडव; एकाच वेळी 42 अंत्यसंस्कार.

अहमदनगर दि.9 एप्रिल – अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जशी कोरोना बाधित रुग्णांची वाढ होते त्याच प्रमाणात कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. गुरुवारी अहमदनगर मध्ये एकाच दिवशी 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सर्व रुग्णांवर अहमदनगरच्या अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला असून एकापाठोपाठ एक जळत असलेल्या मृतदेहाच्या दृश्याने अवघ्या महाराष्ट्राचे मन सुन्न झाले आहे.

(Orgy of death in Ahmednagar; 42 funerals at once.)

दोनच दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एकाच सरणावर आठ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. या पाठोपाठ आता अहमदनगर (Ahmednagar) येथून मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर दिसुन येत आहे. जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात 2233 रुग्ण कोरोना बाधित (Corona Positive) झाल्याची उच्चांकी नोंद झाली आहे. तर तब्बल 42 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. या सर्व रुग्णांवर नगरच्या अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमरधाम येथे असलेल्या विद्युत दाहिनीत 20 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर उर्वरित 22 रुग्णांचे मृतदेह जमीनीवर लाकडी सरणावर ठेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. एकापाठोपाठ एक मृतदेह हे रात्री अमरधाम येथे जळत होते. हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपायोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. अहमदनगर शहरात अमरधाम मध्ये दोन विद्युत दाहिनी आहेत. यामध्ये आणखीन एक विद्युत दाहिनी बसवावी, अशी मागणी नगरसेवकाकडून होत आहे.

अंबाजोगाई, नांदेड, औरंगाबाद पाठोपाठ आता अहमदनगरमध्ये मृत्यूचे तांडव दिसत आहे. अहमदनगरमध्ये अंत्यविधीसाठी विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. गतवर्षी अहमदनगर मध्ये 9 ऑगस्ट 2020 रोजीही अशीच समस्या उद्भवली होती.

कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णवाढीच्या बाबतीत अहमदनगर जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर आला आहे. तर देशातील टॉप टेन मध्येही जिल्ह्याचा समावेश झाला आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दीड हजारांवर रुग्ण सापडत आहेत. त्यात दोन वेळा दोन हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे दररोज सरासरी 15 ते 20 जणांचा मृत्यू होत आहे. गुरुवारी हा अाकडा 42 वर गेल्याने यंत्रणा कोलमडून पडली. अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेतून मृतदेह नेले जातात. बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्या नातेवाईकांनीही ताटकळत बसावे लागते. गुरुवारी रात्री एकाच शववाहिकेत सहा मृतदेह एकावर एक ठेवून अमरधाममध्ये नेण्यात येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!