उद्यापासून एसटी बस धावणार; बीड जिल्ह्यात नवीन निर्बंधाचे आदेश लागू; लग्नासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 जणांना सुट.

बीड दि.4 एप्रिल – बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी आज नवीन निर्बंधाचे आदेश काढले आहेत. पुढील दि.15 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध जाहिर करण्यात आले आहेत. यात समाधानाची बाब म्हणजे गेली दहा दिवस बंद असलेली एसटी बस (ST Bus) पुर्ववत धावणार आहे. यामुळे प्रवासी वर्गास दिलासा मिळणार आहे.
(ST bus will run from tomorrow; New restrictions imposed in Beed district; 50 for wedding and 20 for funeral.)
आज दि.4 एप्रिलच्या मध्यरात्री दहा दिवसांचा लॉकडाऊन (lockdown) संपत आहे. यामुळे दि.5 पासून नवीन निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यापुर्वी दिलेल्या निर्देशात अंशतः बदल करत नव्याने नियमावली जाहिर करण्यात आली. यात प्रामुख्याने पुढील आदेशापर्यंत आता लग्न समारंभ केवळ 50 लोकांच्या तर अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहे. मात्र लग्नासाठी आता पोलिस परवानगी व कोविड तपासणी बंधनकारक असणार आहे.
याशिवाय पुर्वीप्रमाणे कोरोना बाधित आढळून येणाऱ्या भागात आता कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येणार आहे. बाधिताच्या संपर्कातील लोकांचा शोध घेवून,14 दिवस अलगीकरण होईल. राज्य शासनाच्या सर्व निर्बंधाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. शिवाय मास्क न वापरणाऱ्या वर दंडात्मक कारवाई व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या वर 1000 रु. दंड आकारला जाणार आहे.
आज राज्यशासनाने जाहिर केलेल्या सर्व निर्बंधाचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. लॉकडाऊन (lockdown) संपल्यामुळे मात्र नियोजित लग्न सोहळ्यांना दिलासा मिळाला असून 50 लोकांत विवाह सोहळा उरकता येणार आहे. परंतू यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार आहे.
एसटी बसच्या सर्व फेऱ्या सुरु होणार- स्वामी
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी उद्या पासून राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा निर्बंधासह पुर्ववत सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व आगारातून एसटी बसेस (ST Bus) धावणार असल्याने प्रवाशी वर्गाला दिलासा मिळाला आहे. याबाबत धारुर आगार प्रमुख शंकर स्वामी यांच्या कडून माहिती घेतली असता त्यांनी येथील आगारातून सर्व लांब पल्ल्याच्या व स्थानिकच्या बस फेऱ्या सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले.