पोलीस भरतीचा मार्ग मोकळा…. शासनाने काढले आदेश

मुंबई: दि.२२- राज्य शासनाच्या वित्त विभागाने पदभरतीवर आणलेल्या निर्बंधातून सूट देत पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास गुरुवारी शासन आदेश काढत मान्यता देण्यात आली आहे. २०१९ मधील रिक्त ५,२९७ पदे भरण्याला पहिल्या टप्प्यात अनुमती देण्यात आली असून, उर्वरित पदांसाठीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ४ मे २०२० रोजी एक आदेश काढून वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य विभागांची कोणतीही पदे भरण्यावर निर्बंध घातले होते. गुरुवारी काढलेल्या आदेशाने गृह विभागाला पोलीस भरतीसाठी त्यातून सूट देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस (Police) शिपायांची पदे १०० टक्के भरण्याला अनुमती देण्यात येत असल्याचे वित्त विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे. दिनांक १३ नोव्हेंबर २०२० च्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपायांची २०१९ मधील रिक्त ५,२९७ पदे तसेच २०२० मधील ६,७२६ पदे, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी ५०५ अशी एकूण १२,५२८ पदे भरण्यासाठी आधीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यासंबंधीचा शासन आदेश गुरुवारी काढण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे पोलीसभरती रखडली होती. मात्र, आता पोलीसभरती घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त भागासह पाच हजार जागांसाठी भरती घेण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गुरुवारी दिली. राज्यात पोलीस शिपायांची पदे भरण्याचा शब्द महाआघाडी सरकारने पाळला आहे. या आदेशामुळे पोलीस (Police) दल अधिक मजबूत होण्यास मदत होईल असेही गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यावेळी सांगितले.