शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण….. एका शेतकऱ्याचा मृत्यू

दिल्लीः दि.२६- दिल्लीत गेली दोन महिने सुरु असलेले शेतकरी आंदोलन (farmer movement) दिवसेंदिवस चिघळत असून आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला ठिकठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट होत असल्याचंही पाहायला मिळत आहे. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती येत आहे. दरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्यात शेतकरी आंदोलक धडकले आहेत.
आयटीओ परिसरात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. आयटीओ परिसरात आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात येत होता. या शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आयटीओ परिसरात अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे. शेतकरी आंदोलकांनी (farmer movement) पोलिसांविरुद्ध नाराजी जाहीर केली आहे. आंदोलनाची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भारतीय किसाय युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. आंदोलकांनी या व्यक्तीचा मृतदेह आयटीओच्या मुख्य चौकात ठेवला आहे. इथून आम्ही हटणार नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे. या चौकाच्या जवळच दिल्ली पोलिसांचं मुख्यालय आहे. दुसऱ्या बाजूला प्रगती मैदानाच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. नांगलोई या भागातही तणावपूर्ण स्थिती आहे. नांगलोईत हजारो शेतकरी उपस्थित आहेत आणि ते दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. याही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराचा मारा केला आहे. ट्रॅक्टर परेडदरम्यान अक्षरधाम फ्लायओव्हर परिसरात शेतकरी आंदोलक आणि पोलीस (Police) यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान ट्रॅक्टर परेड शांततामय पद्धतीने करायची होती हा आमचा सहमतीने घेतलेला निर्णय होता. मात्र ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या आहेत ते योग्य नाही असं शेतकरी नेत्याने सांगितलं. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांनी (Police) उभे केलेले अडथळे तोडले आहेत, तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.