टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन होणार शिथिल; बीडचं काय?

मुंबई दि.24 मे – राज्यात ‘ब्रेक द चैन’ (Break the chain) मोहिमेअंतर्गत निर्बंध लावण्यात आलेली आहेत. तर अनेक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे. कोरोनाची दुसरी लाट (Second wave of Corona) ओसरत असताना आता राज्य सरकारने परिस्थिती पाहून 30 जूनपर्यंत चार टप्प्यात लॉकडाऊन (Lockdown) शिथिलतेच्या नियोजनाला सुरवात केली आहे.
(The phased lockdown will be relaxed; What about Beed?)
तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ‘ब्रेक द चैन’ (Break the chain) मोहिमेतील काही निर्बंध पुढेही कायम राहतील. पहिल्या टप्प्यात दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत केली जाईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. नागरिकांना खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळाला तर दुकानदारांनाही त्याचा लाभ होईल, असा त्यामागे हेतू आहे.
राज्यातील कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट (Second wave of Corona) आता ओसरत असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या साडेतीन लाखांपर्यंत आली आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड शिल्लक असून ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. तत्पूर्वी, दुसऱ्या लाटेत 23 एप्रिल ते 23 मे या काळात राज्यात 14 लाख 17 हजार रुग्ण आढळले तर 24 हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लॉकडाऊन (lockdown) शिथिलतेबाबत जपून पाऊल टाकत आहे.
एकाचवेळी नागरिकांची मोठी गर्दी होईल, अशा आस्थापनांना 30 जूनपर्यंत सवलती दिल्या जाणार नाहीत, असे नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग अडचणीत सापडले असून त्यांना सवलती दिल्या जातील. दरम्यान, ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्याने राज्य सरकारने पूर्वतयारीसाठी एक हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यातून 40 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केले जात आहेत. तर रेमडेसिव्हिर खरेदीसाठीही निधी राखून ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात अजूनही अपेक्षित यश मिळाले नसून, दुसरीकडे ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत राज्याची आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे, याचा अंदाज सर्वांनाच आला. सध्या नागपूर, नाशिक, नगर, बीड, अमरावती, यवतमाळ, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, जळगाव अशा 15 जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या अजूनही कमी झालेली नाही.
अशा परिस्थितीत लॉकडाऊन शिथिलतेची घाई न करता टप्प्या-टप्प्याने निर्णय घ्यावेत, असे आपत्ती व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. शासन आगामी काळातील तिसऱ्या लाटेसाठी पुर्वतयारी करत असून बाल कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
बीडचं काय?
गेल्या आठवड्यापासून बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होत असल्याचे चित्र आहे. मात्र, जिल्ह्याचा मृत्यू दर वाढला असल्याचे गंभीर बाब समोर आली आहे. जिल्ह्यात 15 मे 25 मे या दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. सोमवार किंवा मंगळवारी जिल्हाधिकारी लॉकडाऊन बाबत पुढील निर्णय घेवू शकतात.
लॉकडाउन शिथिलतेचे संभाव्य टप्पे…
⇒ पहिला टप्पा : दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत वाढविणे
⇒ दुसरा टप्पा : लोकांच्या दररोजच्या जीवनाशी निगडित आणखी काही दुकानांना परवानगी
⇒ तिसरा टप्पा : हॉटेल, परमीट रूम, बिअरबार, मद्यविक्री दुकाने निर्बंधासह सुरू होतील
⇒ चौथा टप्पा : मुंबई लोकल, मंदिरांसह धार्मिक स्थळे, जिल्हाबंदी उठू शकते.