एकाच कुटूंबातील पाच जणांचा पाण्यात पडून मृत्यू; महाराष्ट्रातील या गावावर शोककळा.

कल्याण दि.8 मे – एका दगड खाणीच्या पाण्यात पडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना समोर आली आहे. मृतात दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. कल्याण ग्रामीण परिसरातील संदप गावानजीक असलेल्या देसले पाड्यात ही घटना काल शनिवारी (दि.7) सांयकाळी घडली.
महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून अनेक भागात पाणी टंचाईच्या (Water scarcity) झळा बसत आहेत. आणखी काही दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे. यातच कल्याणच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईने या पाच जणांचा बळी घेतला असल्याचे बोलले जात आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार देसले पाड्यातील पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या पत्नी मीरा गायकवाड, त्यांची सून अपेक्षा गायकवाड, नातू मोक्ष, निलेश आणि मयुरेश हे पाचही जण दगड खाणीतील पाणवठ्यावर सायंकाळी कपडे घेण्यासाठी आले होते. या पाचही जणांचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना कळताच अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री आठ वाजेपर्यंत शोधून बाहेर काढले. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनूसार जवळच्या खदानीतील पाण्यावर गायकवाड कुटुंब कपडे धुण्यासाठी आले होते. तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे हे कुटुंब याठिकाणी आले होते. पाणी टंचाईमुळेच या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे . ही घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. प्रशासनाने आता तरी डोळे उघडून या भागातील पाणी समस्या सोडवावी, प्रशासन अजून किती जणांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
( Five members of the same family drowned; Mourning on this village in Maharashtra. )