बीडसह राज्यभर अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त…. पहा काय आहे राज्यातील परिस्थिती

बीड: दि.१९- राज्याला बुधवारी रात्री विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला. यात मराठवाडा आणि विदर्भात वीज पडून एकूण ६ जण ठार झाले. बीड जिल्ह्यात मध्यरात्री सुरु झालेला वादळी वाऱ्याचा पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत सुरुच होता. या पावसाने राज्यभर मोठे नुकसान केले असून शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गारपीट झाली असून आजही पाऊस आणि गारपीट सुरु राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा अंदाज आज खरा ठरला आहे.

(Untimely rains devastate farmers across the state including Beed)

रात्री झालेल्या पावसात नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात माधव दिगंबर वाघमारे (५०), तर चिंचखेड येथे आनंदराव शामराव चव्हाण (६५) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात तडेगाव येथील राहुल रामसिंग सुंदरडे (२७) यांचा वीज पडून मृत्यू झाला. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड आणि जालना जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिके उद्धवस्त झाली आहेत. आधी अतिवृष्टी, पुरामुळे खरीप हंगाम हातचा गेला, आता गहू, हरभरा, ज्वारी, कांदा ही रब्बी पिकेही उद्धवस्त झाली. यासह मोठ्या प्रमाणात आलेला आंबा, द्राक्षे, चिंच, पपई, टरबुज, खरबूज अशा विविध फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

अवकाळी पावसाने राज्यभरात पिके भुईसपाट केली. मराठवाडा, विदर्भासह नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना गारपिटीने झोडपले. कोल्हापूर, सांगलीतही बुधवारी आणि गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

नाशिकमध्ये द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. तर कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील जोगेवाडी धनगरवाड्यावर बर्फवृष्टी झाली. कोकणातही पनवेल, कामोठे येथेही विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारपीट झाली.

मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, सहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवलीसहीत अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. पावसामुळे शहर भागात गारवा पसरला.

बुलढाणा जिल्ह्यातही काही भागात गारपीट झालीय. गारपीटीमुळे गहू, हरभरा या पिकांना फटका बसला.

सोलापूर जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. पंढरपुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू आहे.

उत्तर रायगडलाही अवकाळीने झोडपलंय. सुधागडसह कर्जत, खालापूर, पनवेलमध्ये गारांसह जोरदार पाऊस झाला. तर अनेक भागात वीजपुरवठा खंडित झालाय. दक्षिण रायगड पाठोपाठ उत्तर रायगडलाही संध्याकाळी अवकाळी पावसानं झोडपलं. माथेरानमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. पावसानं कडधान्य पिकासह आंब्याचंही नुकसान होण्याची भीती व्यक्त होतेय.

कोल्हापूर जिल्ह्यातही बहुतांश भागात अवकाळी पाऊस झालाय. पिकांचं मोठं नुकसान झालंय. भुदरगड तालुक्यात जोरदार गारपीट झालीय. गारपीटीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यात पीकं भुईसपाट झाली आहेत.

गारपिटीमुळे अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या खंडूखेडा या गावाला अक्षरशः काश्मीरचं स्वरूप आलं होतं. परिसरात पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. मेळघाटात सर्वदूर पाऊस कोसळत असतांना खंडूखेडा गावात प्रचंड गारपीट झाली. जमिनीवर शेतात अक्षरशः बर्फ साचल्यासारखं दिसत होतं. पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातलं पीक हातचं गेलंय. गहू, हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालंय.

उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने झोडपलं. भीमाशंकर परिसरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
(Untimely rains devastate farmers across the state including Beed)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!