जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ; शिक्षकांना वेठीस धरण्याचे प्रकार

बीड दि.27 मार्च – महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कितीही निर्बंध घेतली तरी लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दहा दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) केला आहे. वरिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा वगळता सर्व शाळा कॉलेजेस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही कांही शाळा मात्र शिक्षकांच्या आरोग्याशी खेळ करत विनाकारण शाळेत बोलावून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करताना दिसत आहेत.
(Strike against Collector’s order; Types of teacher bullying)
जिल्ह्यात कोरोनाचे वाढते चक्र पाहता त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा सील केल्या आहेत. आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत तर वाहतूकही ठप्प केलेली आहे. यातच अनेक शाळांत विद्यार्थी व शिक्षक कोरोना बाधित (Corona Positive) झाल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे संभाव्य धोका पाहता 10 वी 12 वी चे सुरू असलेले वर्गही बंद करण्यात आली आहेत. मात्र वरिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षेसाठी गरजे पुरते कर्मचारी वगळता इतरांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र असे असतानाही जिल्ह्यातील कांही शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य विनाकारण शिक्षकांना शाळेवर बोलावून त्यांना वेठीस धरण्याचे काम करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सदरील प्रकारामुळे शिक्षकांना कोरोनाच्या भीतीने मानसिक ताण येत असून दहशतीखाली वावरताना दिसत आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी सक्त आदेश देऊनही कांही मुख्याध्यापक विनाकारण सर्व शिक्षकांना शाळेत बोलावून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. त्याच बरोबर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचाही भंग करत आहेत. हा मोठा गुन्हा असून अशा प्रकारामुळे शिक्षकांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुख्याध्यापकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मानसिकरित्या खचलेले शिक्षक करत आहेत. दरम्यान लॉकडाऊन (Lockdown) काळात हे मुख्याध्यापक महाशय शिक्षकांच्या सह्या सुद्धा मस्टर वर करून घेत आपल्या अज्ञानाचे दिवे पाजळताना दिसत आहेत.
असाच प्रकार आष्टी तालुक्यात पहायला मिळाला. आष्टी तालुक्यात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या पंचायत समितीच्या 7 कार्यालयाला दिलेल्या 50 टक्के च्या आदेशाचे वेगळा अर्थ काढत चक्क जिल्हा परिषद शाळांमधून आणि खासगी संस्था मधील शिक्षकांना हजर राहण्याचे व्हाट्सएपच्या माध्यमातून आदेश दिले आहेत. दरम्यान या संदर्भात गटविकास अधिकारी सानप यांनी सांगितले की ,हा आदेश फक्त पंचायत समितीच्या 7 कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी असुन शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.