अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयची छापेमारी; मुंबईसह नागपूरमध्ये दहा ठिकाणी छापेमारी.

मुंबई दि.24 एप्रिल – शनिवारी सकाळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं (CBI) छापेमारी केली आहे. सीबीआयनं मुंबईत बांद्रा, वरळी तसेच नागपूर येथील दहा ठिकाणी छापेमारी केली आहे. सीबीआयनं चौकशी केल्यानंतर दिल्लीमध्ये अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.(CBI raids Anil Deshmukh’s house; Raids at ten places in Nagpur including Mumbai.)
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआयनं (CBI) चौकशी केली. वाझे यांच्या मार्फत महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीरसिंग यांनी केला होता.
पहिल्यांदाच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून थेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप झाल्यामुळं सरकारला अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं होतं. न्यायालयानं याप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता. त्यानुसार, सीबीआयन 15 दिवसानंतर अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुंबईसह राज्यातील 10 ठिकाणी घर आणि मालमत्तांवर छापेमारी केली आहे.
पीपीई किटमध्ये सीबीआय अधिकारी.
सीबीआयकडून मुंबईसह नागपूरमध्ये छापेमारी सुरु केली. यावेळी सर्व अधिकाऱ्यानी पीपीई किट परिधान केलेले होते. देशमुख यांच्या निवासस्थानी छापेमारी करुन त्यांची मालमत्ता तपासली जात असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्याकन सांगण्यात आले. दरम्यान, विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक सुरु आहे. सीबीआय छापेमारीनंतर काय भुमिका घ्यायची यावर चर्चा सुरु असल्याचे सुत्रांकडून समजते.
काय आहे प्रकरण?
25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर एका कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. काही दिवसांनी कारचे मालक मनसूख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणात मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे अडकल्यानंतर याप्रकरणाला राजकीय वळण लागले. विरोधीपक्षांनी विधानसभेत आणि बाहेरही हा मुद्दा उचलून धरत, कारवाईची मागणी केली. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीरसिंग यांना हटविले. त्यांच्या जागी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.
या कारवाईनंतर परमबीरसिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावरच खंडणीचे आरोप केले. बार मालक, हुक्का पार्लर यांच्याकडून महिन्याला 100 कोटी रुपये खंडणी गोळा करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप परमबीरसिंग यांनी लगावला. या खंडणीच्या दबावामुळेच वाझेंनी कृत्यं केली का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.
एफआयआर दाखल
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईसह नागपूरमध्ये आज छापेमारी
दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.