शिवसेनेत खळबळ … आमदारांच्या बंडानंतर आता खासदारांची भुमिका काय ?

मुंबई दि.2 जुलै – गेली पंधरा दिवस महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीची ठरली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं बंडखोरी करत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केलं. शिंदे गटात शिवसेनेचे (Shiv Sena) तब्बल 39 आमदार सामील झाले. शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आमदारांच्या बंडानंतर आता खासदारांची भुमिका काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 14 खासदार वेगळा विचार करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनूसार शिवसेना खासदारांच्या एका गटाने शुक्रवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यस्थी करण्याची विनंती या खासदारांनी केली आहे. भाजपाच्या एका केंद्रीय नेत्याच्या दाव्यानुसार शिवसेनेतील आमदारांच्या बंडाचे परिणाम खासदारांवरही पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेच्या 19 पैकी कमीतकमी 12 खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात असल्याची प्रतिक्रिया या नेत्याने व्यक्त केली आहे.
शुक्रवार दि.1 जुलै रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. सुत्रांच्या माहितीनुसार पक्षातील ज्येष्ठ नेत्यानी शिंदेंच्या नेतृत्वातील बंडखोर आमदारांना पक्षात सामील करुन घेण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावर ठाकरे यांनी अद्याप कसलीही भुमिका घेतलेली नाही. परंतू शिवसेनेच्या या बैठकीनंतर शिंदेंवर पक्षाकडून कठोर कारवाई करत एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला.
शिवसेनेचे लोकसभेत एकूण 19 तर राज्यसभेत 3 खासदार आहेत. या सर्व खासदारांची बैठक घेण्यात आली. शिवसेना खासदारांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत तीन खासदार अनुपस्थित होते. यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे. भावना गवळी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. तर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत. ठाण्याचे खा. राजन विचारे हे देखील एकनाथ शिंदे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.
या तीन खासदारांशिवाय अद्याप इतर खासदारांनी शिंदे यांच्या बंडखोरीबाबत भाष्य केलेले नाही. मिळालेल्या माहितीनूसार शिवसेनेचे खासदार संभ्रमावस्थेत आहेत. यातच बंडखोर आमदारांचा प्रभाव खासदारांवर झालेला नसल्याची प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपण कायम उध्दव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान येत्या 18 जुलै रोजी होत असलेल्या राष्ट्रपती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत आणखी काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागुन आहे.
( Excitement in Shiv Sena … What is the role of MPs now after the revolt of MLAs? )